कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली   

कोल्हापूर : मान्सूनच्या आधीच अवकाळी पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन कसबा बावड्यातील राजाराम बंधारा शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या बंधार्‍याजवळ १७ फूट इतकी पाणी पातळी आहे.
 
गुरुवारी बंधार्‍याजवळ साडे पंधरा फूट इतकी पाणी पातळी होती. अवघ्या २४ तासांत दीड फुटाने पाणी पातळीत वाढ होऊन ती १७ फुटांवर गेली. दरम्यान, जूनच्या एक तारखेला बंधार्‍याच्या लोखंडी प्लेट काढल्या जातात. मात्र, अचानक पडलेल्या पावसामुळे पाटबंधारे विभागाला लोखंडी प्लेट काढता आल्या नाहीत.
 
आता पावसाच्या उघडिपीनंतर या प्लेट काढण्याचे काम पाटबंधारे विभाग हाती घेणार आहे. एकदा काढलेल्या प्प्लेट चार महिन्यानंतर म्हणजेच पावसाळा संपल्यानंतरच बसवल्या जातात. दरम्यान बंधार्‍यावर पाणी आल्याने नेहमी या मार्गावरून कामानिमित्त ये-जा करणार्‍यांना आता लांबचा पल्ल्यावरुन ये-जा करावी लागणार आहे.  

Related Articles